MOTHER,,,,,,,,,,,,,,,,,,

21/03/2013 13:34

आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण या घराच्या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही. बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता ?आई? विषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे, देवादिकांनी देखील आईचेच गोडवे गायले आहेत. लेखकांनी, कवींनी आईचं तोंड्भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाविषयी कुठेच फरसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा, समाजात एक-दोन टक्के बाप असे असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

आईकडे अश्रुंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना? पण श्रेय मात्र नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आमची आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा आमचा बाप मात्र आम्ही सहजपणे विसरुन जातो. आई सर्वासमोर मोकळेपणाने रदू शकते पण रात्री उशीत तोंड खुपसून रडतो तो ?बाप?. आई रडते पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई मेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींचा आधार व्हायचं असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तर पोरांसाठी अश्रुंना आवर घालावा लागतो.

जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी, देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून श्रीकृष्णाला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुध्दा लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्रवियोगानं तडफडून मेला तो दशरथ होता, वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे बघितलं की त्यांचे प्रेम कळतं, त्यांची फाटकी बनियन बघितली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडलीत, त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवितो.
मुलीला गाउन घेतील, मुलाला लुंगी घेतील, स्वतः मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये, मुलगी पार्लरमध्ये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीचा साबणाने दाढी खरडतो. अनेकदा नुसती पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं, घरात दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलीला मेडिकल, मुलाला इंजिनीअरींगला प्रवेश मिळ्वून दिला जातो. ओढाताण सहन करुन त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठ्विले जातात पण सगळी नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रुममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापानी पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात, एकमेकांच्या बापाच्या नावांनी हाका मारतात.

आई घराचं मांगल्य असेल, तर बाप घराचं अस्तित्व असतो, ज्या घरात बाप अस्तित्व असतो, ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणीहे बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो, सांभाळत असतो, कोणाला मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणं टाळता येतं, पण बाप कधीच बाप होण टाळत नाही, आईच्या असण्याला अथवा होण्याला बापामुळे   अर्थ असतो.
कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते,कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कोणी दखल घेत नाही.

चटका लागला, ठेच लागली, फटका बसला तर ?आईग? हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येउन अचानक ब्रेक लागतो तेव्हा ?बापरे? हा शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठमोठी वादळ पेलताना बापच आठवतो.

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातली सर्व मंडळी जातात, पण मयताच्या प्रसंगी जावंलागतं ते बापालाच. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप... खरचं किती ग्रेट असतो ना?
वडिलांचं खरं महत्व कोणाला कळतं, लहान्पणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. एकेका वस्तुसाठी ज्यांना तरसावं लागतं त्यांना.
वडिलांना खऱ्या अर्थानं समजून घेते ती म्हणजे त्या घरातली मुलगी. सासरी गेल्यावर किंवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना त्याचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजुला ठेवून बापाच्या इच्छेखातर बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी देखिल आपल्याला तसंच जाणावं इतकीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असते.